Sunday, August 9, 2020

वन्स मोअर!



तुमचं असं कधी झालंय का, की एखादी खूप सुंदरश्या अनुभवाची आठवण असते. ती घटना किंव्हा तो अनुभव ज्या एक विशिष्ट रीतीने आकारास आला, त्यापेक्षा अधिक सुंदर पद्धतीने येऊच शकला नसता ह्याबद्दल तुमची खात्री असते. जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तुम्ही त्या प्रसंगाची अथवा अनुभवाची मनोमन उजळणी करता किंव्हा कुणालातरी तो अनुभव कसा लाजवाब होता हे अगदी रंगवून रंगवून सांगता. बहुतेक वेळा समोरची व्यक्ती तुमच्या वर्णनात तितकी रंगून जात नाही. कारणे दोन. एक म्हणजे तुम्ही तो अनुभव प्रत्यक्षात अनुभवला असतो, त्या व्यक्तीने नाही. आणि दुसरं म्हणजे, त्या व्यक्तीला तेवढ्यात, अगदी तसलाच, किंबहुना तुमच्या अनुभवापेक्षा किंचित सरस असा स्वतःचा किस्सा आठवला असतो. आणि "अरे हे तर काहीच नाही.." अशी काहीशी सुरुवात करून आपला अनुभव सांगायची घाई झाली असते. असो.
तर काय सांगत होतो? सुंदरसा अनुभव. तर हा अनुभव म्हणजे एखादी रंगलेली गप्पांची मैफल असू शकते. किंव्हा एखाद्या दैवताची भेट. किंव्हा एखाद्या स्थळाला दिलेली भेट. एखाद्या भन्नाट पदार्थाची चाखलेली चव. काहीही. बहुधा प्रत्येक वेळी तो प्रसंग आठवल्यावर, पुन्हा संधी मिळाल्यावर तो पुन्हा घ्यायचा असा तुम्ही मनोमन ठरवता. आणि इथे तुम्ही थोडे डळमळीत होता. 
अगदी सगळ्या गोष्टी जश्याच तश्या जरी घडल्या तरी तो अनुभव तितकाच आनंददायी आणि अविस्मरणीय होईल असं तुम्हाला वाटत नाही. पहिल्यांदा, अगदी अनपेक्षित रित्या, आलेला तो अनुभव, दुसऱ्यांदा, अपेक्षा ठेऊन, ठरवून घेतला तर तितकाच सुंदर ठरेल ह्याबद्दल तुम्हाला खात्री वाटत नाही. खरं तर हा दुसरा अनुभव घेण्याचा प्रयत्न, आधीची आठवण देखील स्पॉइल करेल की काय  अशी सार्थ भीती आपल्याला वाटते. माणसाच्या स्वभावाची गंमत आहे की नाही? 
मला वाटतं एखाद्या वेळी सगळ्या गोष्टी अनपेक्षितपणे जमून येतात आणि ते प्रसंग यादगार बनून जातात…ह्यात ते अनपेक्षित रित्या होणं सगळ्यात महत्त्वाचं…आणि म्हणूनच तो प्रसंग पुन्हा घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा नवीन आठवणी बनवणं कधीही सोप्पं आणि श्रेयस्कर नाही का? रमेश सिप्पीना देखील शोले सारखा बाप सिनेमा काढल्यावर शान काढल्याचा पश्चाताप झालाच ना? 

No comments: