Sunday, August 9, 2020

तुमचं असं कधी झालंय का, की एखादी खूप सुंदरश्या अनुभवाची आठवण असते. ती घटना किंव्हा तो अनुभव ज्या एक विशिष्ट रीतीने आकारास आला, त्यापेक्षा अधिक सुंदर पद्धतीने येऊच शकला नसता ह्याबद्दल तुमची खात्री असते. जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तुम्ही त्या प्रसंगाची अथवा अनुभवाची मनोमन उजळणी करता किंव्हा कुणालातरी तो अनुभव कसा लाजवाब होता हे अगदी रंगवून रंगवून सांगता. बहुतेक वेळा समोरची व्यक्ती तुमच्या वर्णनात तितकी रंगून जात नाही. कारणे दोन. एक म्हणजे तुम्ही तो अनुभव प्रत्यक्षात अनुभवला असतो, त्या व्यक्तीने नाही. आणि दुसरं म्हणजे, त्या व्यक्तीला तेवढ्यात, अगदी तसलाच, किंबहुना तुमच्या अनुभवापेक्षा किंचित सरस असा स्वतःचा किस्सा आठवला असतो. आणि "अरे हे तर काहीच नाही.." अशी काहीशी सुरुवात करून आपला अनुभव सांगायची घाई झाली असते. असो.
तर काय सांगत होतो? सुंदरसा अनुभव. तर हा अनुभव म्हणजे एखादी रंगलेली गप्पांची मैफल असू शकते. किंव्हा एखाद्या दैवताची भेट. किंव्हा एखाद्या स्थळाला दिलेली भेट. एखाद्या भन्नाट पदार्थाची चाखलेली चव. काहीही. बहुधा प्रत्येक वेळी तो प्रसंग आठवल्यावर, पुन्हा संधी मिळाल्यावर तो पुन्हा घ्यायचा असा तुम्ही मनोमन ठरवता. आणि इथे तुम्ही थोडे डळमळीत होता. 
अगदी सगळ्या गोष्टी जश्याच तश्या जरी घडल्या तरी तो अनुभव तितकाच आनंददायी आणि अविस्मरणीय होईल असं तुम्हाला वाटत नाही. 

Saturday, August 8, 2020

प्रतिसाद

आमच्या ठाण्याच्या घराच्या खिडकीत बसून, वाफाळणाऱ्या चहाचा आस्वाद घेत बसायला मला फार म्हणजे फारच आवडतं. सोबतीला एखादं छानसं पुस्तक किंव्हा ताजं वृत्तपत्र. मधून मधून बाहेर नजर टाकत असं चहा पिण्यातली गंम्मत काही औरच. माझी निवांतपणाची ती व्याख्या आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यात बाहेर पाऊस पडत असेल तर काही विचारायलाच नको. 

आजही अशीच एक शनिवारची सकाळ आहे. बाहेर पाऊस मी म्हणतोय आणि मी हातात गरमागरम चहाचा कप घेऊन बसलोय. काँक्रीट, पत्रे आणि ताडपत्रीवर पडणाऱ्या पावसाच्या आवाजाची, इमारती आणि झाडं ह्यांतून धसमुसळेपणाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या आवाजाची, खाली पडून खळखळत वाहणाऱ्या पाण्याच्या आवाजाची अशी सगळ्यांची मिळून एक मस्त सिंफनी ऐकू येतेय. आणि मी शांत बसून निसर्गाच्या ह्या काहीश्या अतिपरिचयेत अवज्ञा झालेल्या चमत्काराचा साक्षी होतोय.

समोरच्या बैठ्या गॅरेजच्या छतावर मातकट पाण्याचं एक छोटंसं तळं साचलंय. झाडाच्या खाली असल्याने त्यात पाऊस थेट पडत नाहीये. पण झाडाच्या पानांपानांतून ओघळत, घरंगळत काही थेंब त्यात पोहोचताहेत. आणि गंमत म्हणजे त्या पडणाऱ्या प्रत्येक थेंबाची ते तळ्यातलं पाणी अगदी आवर्जुन दखल घेतंय. एक वलय बनवून. ते वलय विस्तारत जातं. तळ्याच्या परिघापर्यंत. आणि मग विरून जातं. कोणतीही खुण मागे न ठेवता. जणू काही झालंच नव्हतं. आणखी काही थेंब पडतात. पुन्हा काही वलये. त्यातील काही एकमेकांना छेदणारी. अखेर विरून जाणारी. हे सुरूच राहतं.

मला खरंच कमाल वाटते पाण्याच्या इतक्या समंजस वागण्याची. कसं काय जमत असेल त्याला इतका नेमका आणि पुरेसा प्रतिसाद देणं. प्रत्येक वेळी. तसूभर जास्त नाही की कमी नाही. थोडाफार काही  फरक असलाच तर तो थेंबाच्या आकारामुळे कदाचित. पण पाण्याचा ओढा ह्या प्रत्येक बदलाला सामावून घेऊन चटकन शांत होण्याकडेच. 

मला प्रश्न पडतो. कुठून येत असेल हे शहाणपण पाण्याकडे? कदाचित हजारो वर्षांच्या अनुभवाने शिकवलं असेल त्याला. आपल्याला जमेल असं समंजसपणे रिऍक्ट व्हायला? एखाद्या प्रसंगाला किंव्हा बदलाला त्याच्या मेरिट प्रमाणे प्रतिसाद द्यायला? खरंतर जमायला हवं. विचार करायला भाग पाडलं खरं त्या लहानश्या तळ्याने. 

विनायक पेडणेकर